ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. नव्वदच्या दशकामध्ये पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या संचालकपदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यानंतर लगेचच पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भूषविणारे ते सर्वांत तरुण नेते होते. त्यानंतर पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. सन १९९१च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून बारामतीमधून विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये रमले. पहिल्यापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी रस घेतला होता. त्यांच्या समवयस्क नेत्यांसोबत त्यांनी त्या वेळेस पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्रे असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे यांना शह देऊन स्वतःचा भक्कम गट तयार केला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड वरील त्यांची सत्ता कायम राहिली.
सन १९९४मध्ये राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार आले तेव्हा अजित पवार यांना विरोधी बाकावर बसावे लागले. पण तो त्यांच्या उमेदीचा काळ होता. त्याचवेळेस पुण्याची जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅँक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्तासूत्रेही त्यांच्याकडे आली होती. शरद पवार यांच्याकडेही कोणी गेले तर स्थानिक कामासाठी ते अजित पवारांना भेटा असे सांगण्याची ती वेळ होती. त्यानंतर १९९८मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांना संघटनेमध्येही महत्त्व मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी राज्यातील आपला संपर्क वाढविण्यासाठी केला. हळुहळू त्यांचा प्रभाव वाढला व पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिकेमध्येही त्यांनी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना आव्हान देण्यास सुरुवात केली होती. सन २००७च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ‘कलमाडी यांना हटवून पुण्याचा कारभारी बदला’ अशी हाक जाहीर प्रचारात दिली आणि पुण्याने कारभारीपद अजित पवार यांच्याकडे सोपविले. त्यानंतर कॉँग्रेसला बरोबर घ्यायचे नाही, या हट्टापोटी त्यांनी शिवसेना-भाजपसोबत आघाडी करून पुणे पॅटर्न राबवित आपली सत्ता कायम राखली. त्यानंतर पुन्हा कॉँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता मिळविली होती.

No comments:
Post a Comment